किल्ले वसंतगड

             कराडपासुन आठ किलोमीटरवर किल्ले वसंतगड हा तसा दुर्लक्षित गिरीदुर्ग़ सह्याद्रीच्या बामणॊली रांगेत वसला आहे. दुसरा भोज शिलाहार राजा याने 11 -12 व्या शतकात हा किल्ला बांधला इ स 1659 मध्ये हा किल्ला त्रपती शिवाजी महाराजांनी वसंतगडाला स्वराज्यामध्ये सामील करुन घेतले. शिवकालीन व पुर्व शिवकालीन इतिहासाचा साक्षिदार हा किल्ला आहे. या गडाच्या पायथ्याशी असणा-या तळबीड या गावाने सरसेनापती हंबीरराव मोहिते व रणरागिणी ताराबाई या अमुल्य रत्नांचा ठेवा महाराष्टाला दिला. ओरंगजेबाने मराठा साम्राज्यावर चढाई करताना पहिली चढाई याच किल्ल्यावर केली इ. स. 1700 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यांनी याचे नाव किली द फ़तेह असे ठेवले इ. स. 1708 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात दाखल करुन घेतला. इ.स.1808 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या गडावर जाण्याकरिता तळबिड, सुपने, वसंतगड यागावातुन रस्ते आहेत.

               वसंतगड किल्ला समुद्रसपाटीपासुन सुमारे 2950 मीटर उंचीवर आहे, आमचा भटक्यांचा ग्रुप आहे. आम्ही सर्वांनी वसंतगड मार्गाने किल्ल्यावर जायचे ठरविले. पावसाळ्याव्यतिरीक्त इतर वेळी आपण गाडीने गडाच्या पायथ्याशी कच्च्या रस्त्याने पोहचु शकतो. पावसाळा असलेने कच्चा रस्ता चिखलमय झाला होता, त्यामुळे गावाच्या शेवटच्या टोकाला गाडीपार्क करुन आम्ही गडावर चढाईला सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला डाव्या बाजुला जाताना ओढा वाहत असुन त्यावर बंधारे बांधले असुन त्यामध्ये पाणी साचले होते. हा परिसर शालु नेसलेल्या गर्द हिरवाईने नट्लेला होता. गडाच्या पायथ्याशी शांत झुळझुळ वाहणारा ओढा पार करुन थोडे अंतर चालुन गेल्यावर गडाची चढाई सुरु होते. गडाच्या पायथ्याशी मध्यम झाडी असुन डोगंरावर जसे जाऊ तशी झाडी विरळ होते. थोडे अंतरावर आल्यावर आम्ही खिंडीत पोहोचलो. या गडावर जाण्याच्या मार्गात केशरी रंगातील खुणांद्वारे मार्गिका आखणेत आल्या असल्याने गडाची चढाई सोइस्कर होते. या खिंडीमध्ये तळबिडहुन येणारा रस्ता मिळतॊ खिंडीतुन थोडे अंतर चालुन गेल्यावर आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहचलो. ब्रिटीशांनी किल्ला ताब्यात घेताना इतर किल्ल्याप्रमाणे या किल्याची अवस्था केली आहे. किल्ल्याच्या अनेक वास्तु ब्रिटीशांनी उध्द्वस्त केल्याने आज मुख्यदरवाजा अस्तित्वात नाही मात्र अवशेषावरुन बुरुज व पाय-यांवरुन त्याच्या भव्यत्वाची व गोमुख बांधणीची प्रचिती येते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुस विघ्नविनाशक गणेशाची मुर्ती असुन तेथुन पाय-या चढुनवर आल्यानंतर भग्नावस्थेतील अवशेष दिसतात हा दिवडीचा भाग असावा. वसंतगड किल्ला सर्वसाधारणपणे 120 एकर परिसरात पसरलेला आहे, त्यापैकी 80 एकर जमिनी सुपिक असुन पावसाळ्यामुळे चिकनमातीचा परिसर असल्याने चिखल् झाला होता. आम्ही उजव्या तटबंदीवरुन चालु लागलो या गडाची संपुर्ण तटबंदी सुस्थितीत आहे. इतर गिरिदुर्गांप्रमाणे तटबंदीखालील कातळ तासुन नैसर्गिक भंत उभारली आहे.

       उजव्या तटबंदीपासुन जवळ एक बुरुज असुन त्याची थोडीफ़ार पडझड झालेली आहे. त्याच्या शेजारी भग्नावशेष असुन हा पुरक किल्ला असल्याने तेथे सैन्याची राहण्याची जागा असावी. तटबंदीवर अनेक जंग्या असुन त्या विविध उंचीवर असुन जंग्यातुन गडाच्या आजुबाजुचा संपुर्ण परिसत टप्प्यात येतो. या बुरुजाशेजारी शोचकुप आहे. या गडावर तटबंदी व बुरुजांवर झाडेझुडपे वाढली असुन त्यामुळे त्याचे अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. येथुन पुढे गेल्यावर दक्षिणेच्या बुरुजाजवळ पोहचलो. येथुन आम्ही खाली पायथ्याकडे जाणा-या टेकडीवर पायवाटेने गड उतरुन खाली उतरुन बुरुजाखालील एका गुहेजवळ पोहोचलो या गुहेची उंची पावणे दोन फ़ुटांपर्यंत असुन रुंदी फ़ारच कमी आहे.एकावेळी गुहेत एकच व्यक्ती यागुहेची लांबी वीस फ़ुटांपर्यंत असुन शेवटच्या टॊकाला विहीरसादृश्य रचना बाहेरुन दिसली. आम्ही पावसाने चिखल व हे वटवाघुळांचा रहिवास असल्याने दुर्गधींमुळे शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकलो नाही. कदाचित ही गडावर जाण्याची चोरवाट किंवा चकवा असण्याची शक्यता असावी. गुहापाहुन आम्ही पुन्हा गडावर गेलो तेथुन पश्चिम बुरुजाकडे कुच केली. गडाच्या मध्यावर एक मंदिर असुन ही त्याची मागील बाजु असुन तेथे कृष्णा जलाशय लागतॊ. गडाला पाणी पुरवठा करणा-या दोन महत्वाच्या जलाशयापैकी एक सुंदर जलाशय पाण्याने काठोकाठ भरला होता. पश्चिम बुरुजाजवळ किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हा किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी संरक्षणाच्यादृष्टीने त्या त्या काळानुसार त्याचे रचनेत बदल केले गेले त्यानुसार या दरवाजाच्या बाजुचे बुरुज बाहेरील बाजुस दरवाजा सहज दृष्टीक्षेपात येणार नाही असे बांधले आहे हे काम शिवकालिन असल्याचे त्याचे रचनेवरुन दिसते. या दरवाजाचे चौकटीचे बाहेरील बाजुस डोक्यावर शेपुट असणारी लढाऊ वीर हनुमानाची मुर्ती आहे. याही बुरुजाशेजारी दिवडीचे अवशेष असुन त्याच्या समोर भिंतीचे अवशेष आहेत त्याच्या रचनेवरुन ती सदर असावी. तेथुन पुढे आम्ही शेवटच्या बुरुजाकडे निघालो.तटबंदी वरुन जाताना ठिकठिकाणी मशाल ठेवण्याच्या खोबण्या आहेत.


          तेथुन पुढे गेल्यावर कोयना तळे लागले हेही स्वच्छ पाण्याने भरुन गेले आहे. या दोन्ही तळ्यांमुळे गडावर वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध होते. गडाने हिरवा पोपटी शालु ल्याला होता. उत्तरेच्या बुरुजावरुन गडाचे व आजुबाजुच्या परिसराचे कोयनापात्राचे विहंगम दृश्य दिसत होते; ते डोळ्यात साठवुन आम्ही गडाच्या मध्यावरील चंद्र्सेन महाराजांच्या मंदिराकडे प्रस्थान केले, हे मंदिर गडावरील मध्यभागी थोड्या उंची वर असल्याचे जाणवते. मंदिरात जाण्यापुर्वी त्याच्या शेजारी वेगवेगळे अवषेश असुन त्याची भौगोलिक स्थिती पाहता तो बालेकिल्ला असावा. बालेकिल्ल्याच्या शेजारी एका मंदिरात गजलक्ष्मीचे सुंदर शिल्प असुन त्या मुर्तीवर खालील बाजुस शिवलिंग पुजेचे शिल्प कोरले आहे. या मंदिराच्या उजवेकडे राममंदिर व डावीकडे विठ्ठल मंदिर आहे.येथुन पुढे एका कमानीमधुन आत गेल्यावर हेमाडपंथी पध्द्तीचे चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिराच्या मंडपात दोन नंदी आहेत त्याच्या मागील बाजुस वर्तुळाकार तीन पदरी कमळकाकृती आहे.स्वर्गमंडपात एका घोड्याचे व इतर मुर्त्या आहेत. गर्भगृहात् चंद्र्सेन महाराजांची मुर्ती असुन डावीकडे जोगेश्वरीची व उजवीकडे जनाईची मुर्ति आहे, जनाईच्या हातात सर्प धारण केला आहे. समोर दिपमाळे शेजारी शेषाशायी विष्णु, वीरगळ तसेच हत्तीच्या मुर्ती असुन त्या मुर्ती गडाच्या प्रवेशद्वारावरील हत्ती असावेत गडावर फ़िरताना विविध वास्तुंचे अवषेश इतरत्र पडलेले दिसतात एकेठिकाणी चुन्याच्या घाण्याचे अवशेष ही आहेत.
                 चंद्र्सेन महाराजांसोबत अशी कथा सांगितले जाते कि ते महाराज हे शुर्पनकेचे पुत्र असुन शंकराचे कठोर निश्चल भक्त होते. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकराने त्यांना खडग दिले राम लक्षम्ण जेव्हा या पर्वतावर आले त्यांना ते पाहुन आश्चर्य वाटले. त्याचा वापर बांबुचे बेट तोडण्यासाठी केला त्यातुन रक्त वाहु लागले. एक योगी तपश्चर्या करत होता त्याचे हात पाय तुटून रक्त वाहत होते पण त्याने तपश्चर्या भंग केला नाही. यानंतर शुर्पनकेने बदला घ्यायचा ठरवला पुढची कथा आपणास ज्ञात आहे. याकिल्ल्यावर सेवानिवृत्त सैनिक राहत असुन त्यांचेकडे आपlI जेवणाची व्यवस्था होऊ शकते. या गडाचे सोंदर्य डोळ्यात साठवुन आम्ही गडाचा दुपारी चार वाजता निरोप घेतला. गडावर फ़िरत असताना मुनियां अन्न टिपताना दिसल्या. किल्ल्याकडे येताना जंगली मैना ओढ्याच्या कडेवरच्या झाडावर बसल्या होत्या.तटबंदीवरुन फ़िरताना दयाळ चिरीक उडताना दिसतो बुरुजावर खाटीक पाठशिवणीचा खेळ खेळत होता. कृष्णा तळ्यात प्लवा बदकांची एकांतप्रिय जोडी निसर्गाच्या कुशीत प्रेमरंगात रंगली होती, जुन ते सप्ट्रेंबर हा विणीचा हंगाम अवशेषात दगडांचे अस्तित्व यामुळे फ़िरताना टिटव्या रक्षणकर्तीच्या भुमिकेत दिसल्या. निरव शांततेत सुमधुर आवाजात रुंजी घालणारा चंडॊल मनाला आनंद देत होता अशा सुंदर   निसर्गाने नटलेल्या एतिहासिक वारशाला नक्कीच भेट द्या.
 



Comments

Popular posts from this blog

चक्रेश्वरवाडी अश्मयुग ते वर्तमान याकाळाच्या प्रवासाचा इतिहासाचा मुकसाक्षीदार

पाणथळीतील पक्षांचे घर – रामलिंग बेट